महाराजांचे एकदम स्ट्राँग बोलावणे आल्यामुळे त्यांच्या इच्छेने आणि कृपेने परिक्रमा पूर्ण झालीच होती. आता रात्री गिरनार पर्वत चढून जायचा आणि गुरू पादुकांचे दर्शन घ्यायचे याच गोष्टीचा मनाने ध्यास घेतला होता.(https://muktalikhan2021.blogspot.com/2022/01/Maharajanche-Bolavane-Aale-aahe.html)
आपली इच्छा शक्ती आणि महत्वाचे म्हणजे समर्पण हे पक्के असेल तर बाकी (ते) महाराज आपल्याकडून सेवा करवून घेतात. या बाबत या पूर्वीच सविस्तर लिहिले आहे.
आम्ही सगळे गिरनार परिक्रमा, गुरुशिखर दर्शन घेऊन दुपारी पायथ्याला परत आलो अगदी काहीच वेळ विश्रांती केली आणि सर्व साहित्य, बॅग अवरून लगेच स्टेशनला जायला निघालो.
एकतर गिरनार पायथा ते जुनागड स्टेशनला जायला किमान तीस मिनिटे तरी लागतात. त्यामुळे गाडीच्या वेळे आधी जाणे सोईचे होते. उगाच उशीर करणे आणि मग गडबड करणे हा आमच्या कोणानाच स्वभाव नाही. त्यामुळे जरा लवकरच पोहचू या हेतूनं आम्ही निघालो.
"हे लो भाई" मी रिक्षाचे पैसे त्या रिक्षचालकांना दिले
"जय गिरनारी, फिर आना भाईजी" तो पण पैसे घेत घेत म्हणाला.
"जय गिरनारी" आम्ही सगळ्यांनी त्याला हात वर करून प्रतिसाद दिला.
मला काही काही गावं, स्टेशन, बस स्टँड यांच्या कडे पाहिले की असे वाटते की, त्यांना बहुदा ओळखच तेथील तीर्थ क्षेत्र किंवा प्रसिद्ध वास्तू यांच्या मुळे मिळते. उदा, श्री विठ्ठल - पंढरपूर, योगेश्वरी देवी- अंबेजोगाई अगदी तसेच जुनागडचे पण आहे. त्यामुळे प्रवासी दिसले, म्हणजे गावातील लोक गिरनारला येणाऱ्या भाविकांना आपोआप ओळखतात आणि स्वतःहून "जय गिरनार" असा उद्घोष करतात.
आम्ही गाडीच्या वेळेआधी आल्यामुळे स्टेशन बाहेरच थांबलो होतो. तशी यावेळी गर्दी नव्हतीच कारण गाडीला अजून वेळ ही होता.
आम्ही सगळे एका भल्या मोठ्या कडुलिंबाच्या झाडाच्या
सावलीत उभे होतो.सगळेच परिक्रमा करून आणि गिरनार पर्वत चढून, गुरुशिखराचे दर्शन घेऊन आलो होतो. तरी आता परतीचा प्रवास याचे वेध लागले होते. आम्ही उभ्या उभ्या गप्पा करत होतो तितक्यात मला अचानक बिडीचा उग्र दर्प आला, खरं तर मला सिगरेट, दारू, बिडी यांचे दर्प सहन होत नाहीत. म्हणून रागानेच आजूबाजूला पाहू लागलो.
"क्या ढूंढ रहा हैं, बच्चे?" असा असल्ल हिंदीत साद आला.
मी त्या आवाजाच्या कडे वळलो.
"काहा देख रहा है बच्चे?" परत आवाज आला मागे वळून झाडाला उजवीकडे वळसा घालून मी पुढे गेलो तर एक वयोवृद्ध साधू म्हणा किंवा संन्यासी निवांत जमिनीवर बसले होते. शरीर अतिशय कृश, रंग तांबूस जणू काही उन्हाने रापलेले शरीर दिसावे तसा होता, कंबरेला एक मांडी पर्यंत येईल इतका पंचा गुडळलेला, तोही अतिशय अस्वच्छ, वरचे शरीर पूर्ण उघडे, खपाटीला गेलेले पोट, छातीचा अगदी पिंजरा झालेला, गळ्यात अनेक माळा, त्यात रुद्राक्ष माळा जास्त, गाल पण अगदी आत गेलेले, काहीच दात शिल्लक असतील असा तोंडावळा आणि पांढरी दाढी. डोक्यावर वाढलेले असता व्यस्त पांढरे केस त्याचा छोटा बुचडा असे ते साधू आपल्या उजव्या हातात बिडी चिलमी सारखी धरून पित बसले होते.
त्यांनीच मला आवाज दिला होता, मी त्यांच्या कडे हळू हळू पावल टाकत होतो. तसे ते माझ्या कडे बघून गालात हसत हसत म्हणाले
"जय गिरनारी बाबाss"
"जय गिरनारी" मी पण हात वर करून उद्घोष केला.
"क्या नाम है बच्चे, सब बाबा का है और सब बाबा के लिये चालता है" त्यांच्या उजव्या हातातील विडी जमिनीत विझवत ते बोलत होते.
खरं तर त्यांचे बोलणे माझ्या पार डोक्यावरून जात होते , पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यात मज्जा येत होती. त्यांचे असे अगम्य आणि आपल्याच भाव विश्वात गुतून गेलेले भान हे माझ्या साठी त्यांच्या बाबत कुतूहल वाढवत होते.
"आपका नाम क्या है, बाबा?, एक काहावत है, नदी को उसका मुल स्थान और संन्यासी को उसका कुल नही पूछते, लेकीन फिर भी पूछ रहा हू"
"नाम मैं क्या है बच्चे, सब तो कर्म ही होता है, जो कर्म करोगे वही पावोगे" असा कर्माचा सिद्धांत सांगत माझ्या कडे मायेने पाहत ते बोलत होते.
त्यांच्या आणि माझ्यात बरेच संभाषण झाले, गाडीला वेळ होताच त्यामुळे मी अनेक प्रश्न विचारले त्यावर इतकेच समजले की त्यांनी खूप तरुण वयात संन्यास घेतला आणि भारत भ्रमण करत आता दर वर्षी गिरनार परिक्रमा करत होते.
आमचे बोलणे सुरू होतेच, तेवढयात स्टेशनचा परिसर स्वच्छ करणाऱ्या एक बाई लांब सडक झाडू घेऊन जमीन झाडत झाडत आमच्या दिशेला येताना दिसली.
"लो बाबा..." तीने आपला हात पुढे करत कागदात गुंडाळून काही तरी त्यांच्या हातात देऊ केले.
"लाss बेटाss" अस म्हणत त्यांनी उजव्या हातात तो कागदी पुडा घेतला. ती महिला तो पुडा देऊन वळली तितक्यात बाबांनी तिला परत आवाज दिला
"रुको बेटी, ये लोsss" असे म्हणत त्यांनी तिला एक विसची नोट पुढे सरकवली,
"नहीं नहीं बाबा, ये नही चाहिए, रखलो आप" असे म्हणत त्या बाईंनी पैसे घेण्याल्या नकार दिला.
"अरे बेटा, ले ले, आज का तो बाबा ने दिया हैं, कल का कल देखेंगे? आज बाबाने दिया हैं कल का बाबा ही जाने!!!" वर आकाशाकडे पाहत ते म्हणाले आणि पुढे म्हणू लागले "आज तो हात मैं पैसे है, तो क्यू मोफत खाऊ, कल अगर नहीं होगा, तो देखेंगे?"
खरचं त्यांच्या या दोन वाक्यात किती आशय होता. पैसे आवश्यक आहेतच, पण किती? हे पण तपासले पाहिजे. मी त्यांचा निरोप घेऊन मित्रांकडे आलो आणि विचार करू लागलो. देणारे ' ते ' च, परत घेणारे ही ' ते ' च,मग माझे किंवा आपले काय? काही काही नाही!!! आपल्याला उगाच असे वाटत असते की हे मी मिळवले, माझ्या मुळे हे झाले, वैगरे वैगरे....पण सत्य हेच आहे
"आज का तो बाबा ने दिया हैं, कल का कल देखेंगे?"
©निखिल देविदास वझे
९०११०९६२५०


No comments:
Post a Comment