"इनामदार वाडा"
काल रात्री पासूनची सुरू झालेली वाड्यातील गडबड आज सकाळपर्यंत सुरूच होती. पूर्ण रात्र गेली तरी वाडा काही शांत नव्हता...सर्वांची चलबिचल सुरु होती, काळजीचे वातावरण होते.
गावातील सगळ्यात मानाचा, आधाराचा, अधिकाराचा वाडा म्हणजे गावचा ' इनामदार वाडा' !! अहो, वाडा कसला!!! गढीच ती!!! ह्या अशाss .....चांगल्या गुडघाभर उंचीच्या दगडी दहा पंधरा पायऱ्या चढून वर गेल्यावर शेणानं सरावलेले अंगण, झक्कास रेखाटलेली शुभचिन्ह आणि रांगोळी, लाकडी भक्कम मुख्य दरवाजा,लाकडी खांब व उंबरा ओलांडून आत गेलो की, भला मोठा चौक, त्यात मधोमध कारंज्यासाठी बांधलेला दगडी हौद, डाव्या हाताला पाच सहा आणि उजव्या हाताला पाच सहा मोठ्या खोल्या. मुख्य दरवाजा ओलांडून आत येताना उजव्या हाताला बैठक, तिथे एकदम खानदानी आसन व्यवस्था (गादया, लोड, इ.) तिथल्या भिंतीवर इनामदार साहेबांच्या कुलदेवीचा व गावातील शिवमंदिरचा फोटो होता; त्याचसोबत पूर्वजांचेही फोटो लावलेले होते.
या वाड्याचे सध्याचे मालक म्हणजे 'इनामदार नाना'!..... हो....! यांची गावात अशीच ओळख. आपल्या नावापेक्षा 'इनामदार' या पदवी लाच महत्व जास्त होते. नाना हे असे उंच उभेsss आडवेsss, गावच्याच तालमीत कमवलेले बलदंड शरीर, वय आता साठीकडे झुकलेलं, पण अजूनही लाल मातीच्या आखाड्यात पाच दहा मल्लांना आरामात चितपट करतील असं शरीर ते हातचं राखून होते.
अंगात पांढरा सदरा, पांढरा पायजमा, हातात भारदस्त एकदम जाडजूड सोन्याचं कडं, एकदम तूप लावून पिळ दिलेल्या मिश्या, त्यातील काही केस वयाप्रमाणे रंग बदलायला लागलेले, म्हणजे जरी शरीर अजून मजबूत असलं तरी केसांचा रंग आता काळ्याकडून पांढरा दिसायला लागला होता.... अन् डोक्यावरच्या केसांची पण तीच गत व्हायला लागली होती.
काल संध्याकाळ पासून इनामदार नाना वाड्याच्या चौकातून.... ओसरी वरून ते देवघरा पर्यंत नुसत्या एकसारख्या येरझाऱ्या घालत होते. दुपारी चार नंतर गावातील काही मंडळी ओसरीवर आले होते, त्यांच्या सोबत बैठकीत बसले तरी पण मनाला काही केल्या चैन पडत नव्हते. गावकरी आगामी महाशिवरात्रीच्या उत्सवाची बोलणी करत होते, पण इनामदार साहेब फक्त शरीराने त्या गावकऱ्यांना सोबत करत होते. त्यांचं मन काही जागेवर नव्हतं ...ते सारखा विचार करून आणि काळजीने काळवंडले होते.
"मालकsss मालकss..." दबक्या आवाजात रघु आवाज देत होता.
"मालकsss", त्याच्या बोलवण्याकडे त्यांचे लक्षच नव्हते...."मालकsss"
"काय रे रघ्याss?" रागातच त्यांनी डोळे मोठे करून रघु कडे पाहिले.
"घरात बोलवत्यात? म्हण जीsss!!!" घाबररेल्या रघुचा आवाज फुटेना.... "अरे बोल कीss, आता!!!, का दातखिळी बसली?"
एक जोरात आवंढा गिळून एका दमात त्याने सांगितले
"मालक, बाई आत जेवायला बोलवत्यात जी" रघु हात जोडून आर्जवी सुरात सांगत होता.
"हं.....आलो म्हणून सांग..."
नानांची विचाराची तंद्री मध्येच मोडल्यामुळे ते जरा चिडूनचं आवरायला गेले. मागच्या आडातील पाणी शेंदून हात पाय धुतले, देवघरच्या खोलीत जाऊन देवाला, दिव्याला नमस्कार केला, तेथील रक्षा लावली आणि जेवायला पाटावर बसले खरे पण त्यांचे मन कसल्यातरी चिंतेत होते. ती चिंता, काळजी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. कसे बसे जेवले, शेवटचा ताक भात खाल्ला आणि आचमन घेऊन पानावरून उठले.
करss करss, करss करsss, खटss करss, असा आवाज करणाऱ्या बंगईत बसून एका हातात अडकित्ता, दुसऱ्या हातात सुपारीचे खांडे घेऊन ते कातरत बसले. मध्येच लहान नात येऊन त्यांच्या खाली लटकणाऱ्या पायांशी खेळून गेली, घरातील मांजर त्याच पायांवरून जात येत होते, पण रोज त्या दोघांशी खेळणारे ते आज शांत होते, त्यांचं कशातच लक्ष लागत नव्हतं. आपल्याला हे नेमकं काय होत आहे? हेच त्यांच्या समजण्याच्या पलीकडे होते. पोरीचे लग्न झाले, मुलाचे लग्न झाले.... नातू, नाती असे सगळे आहेत. आयुष्यात आधीही काही पेचाचे प्रसंग आले होते....पण तेव्हा अशी काळजी नव्हती मग आताच हे असे काय झाले? या विचाराने ते अस्वस्थ होत होते.
"आलो जी"
"माझी काठी आणि बॅटरी घे बरं आणि शाल पण आण रे"
"होय जी, आणतू." रघुने आतून आवाज दिला
माजघरातून काळजीचा आवाज आला "आता कुठे?... जरा जपून "
" जरा बाहेर फिरून येतो",
"रघुला सोबत नेता का?"
"नको, जाऊन येतो मी एकटाच, जरा वेळाने येईन. तुम्ही निजानीज करा हवं तर. रघु......आण लवकर, मला यायला उशीर झालाच तर दरवाजा लावून घे आणि ओसरीत झोप म्हणजे मी परत आलो की तुला दरवाजा उघडता येईल."
रघु ने सर्व सामान मालकांना दिले, नाना पायऱ्या उतरून खाली जाताना त्याने पाहिले आणि तो परत वाड्यात शिरला. नाना एका हातात पितळी पत्रा असलेली मुठीची काठी रस्तावर टेकवत टेकवत पुढे निघाले. खरं तर त्यांना काठीचा आधार कधीच लागला नाही पण एक जरब, शान म्हणून ते नेहमी तिचा वापर करत असत. घराघरातील लाईटचा प्रकाश येत होता, रस्त्यावरील लाईट पण सोबतीला होते. विचाराच्या नादातच शिवमंदिरा जवळ आले, बाहेरून त्यांनी नमस्कार केला. गावात या वेळी जो कोणी माणूस घरा बाहेर होता, त्याचा रामराम स्वीकारत पुढे पुढे जायला लागले. आपण बाहेर तर पडलो पण कुठे जावे? असा विचार करत, त्यांनी सरळ मळ्याचीच वाट धरली.
अंधाऱ्या रात्री आपल्या मळ्याच्या दिशेने पायी निघाले, वाड्यापासून तसे अंतर बरेच होते, चालत जायला बराच वेळ लागला.
मळ्यात गडी, राखणदार, वस्तीला होतेच.
"काय ? काय रं, किसन?"
"अरे कोण तरी येताना दिसतंय का रे, त्योक लाईट दिसतयं का?"
"हो रे,पण आता कोण?"
"काठी घे हातात, माहीत नाही कोण असलं ते, अपून बाबा तयार राहू."
"होय होय"
असं म्हणून पांडू आणि किसन अंधाऱ्या रस्त्यातून येणाऱ्या त्या बॅटरीच्या लाईटकडे पाहायला लागले...
"अरे नाही, मीच पाय मोकळे करायला मळ्यात आलो. ही पीकं, ही जनावरं पाहिली की बरं वाटतं".
"हो, पर मग दिवसा आलं पाहिजे होतं जी"
"खाट आण बरं बाहेर.... दमलो, बसतो जरा."
पांड्याने खाट तर खोलीतून बाहेर आणली, सोबत लोटी भर पाणी पण आणले.
नाना खरंच चालून दमले होते. त्या गारव्यात देखील चालून त्यांना घाम आला होता. गड्यानी लोटी समोर केली की लगेच तिला तोंड लावून पूर्ण लोटी पाणी पिऊन रिकामी केली.
"मालक असं उघड्यात, सकाळी सकाळी लय थंड लागतयं मालक! त्रास होईल जी." पांडू ने काळजी करत सांगितले.
"राहू देत, काही होत नाही...जा मी पडतो, तुम्ही पण झोपाss"
तितक्यात किसनने एक जेमतेम उशी आणून दाखवली,
"हो दे"
नानांना उशी देऊन दोघे गडी झोपायला गेले.
नाना मुक्त आकाशाखाली, चांदण्या पाहत, खाटेवर आडवे झाले. काळ्याभोर आकाशात चंद्र शीतल प्रकाश देत होता, ध्रुवतारा, सप्तऋषी , अनेक तारा मंडल आकाशात स्वच्छ दिसतं होते...शीतल वारा वाहत होता, मधेच एखादे वटवाघूळ उडताना दिसत होते, अंधारात काही पिकं अस्पष्ट दिसतं होती. जनावरं गोठ्यात निजली होती, त्यातील कोणी आपली मान हलवली तर त्यांच्या गळ्यातील मोठे पितळी घुंगरू वाजत होते, या सगळ्या वातावरणात नाना जरा वेळ डोळे उघडे ठेऊन आकाशाकडे पाहत पडले, आता त्यांच्या मनाला आणि शरीराला शांतता मिळायला लागली होती. तसेच काही वेळ सताड डोळे उघडे ठेऊन ते पडून राहिले, काही वेळानं आपोआप त्यांचे डोळे लागले. आपला मालक झोपला आहे म्हणून राखणीला असलेले मोत्या, टीप्या आणि राणी हे कुत्रे देखील आवाज करत नव्हते .
"हा बाई"
"अरे ....हा बाई काय? किती वाजले पाहिलेस का? हे अजून कसे नाही आले? यांना जाऊन किती वेळ झाला आहे."
रघु नुकताच घरातील बाकी कामं उरकून आडवा पडला होता.
"हो जी, लय टाईम झाला की"
"कुठे गेले असतील हे? पहा बरं" बाईंनी वाड्यातील सगळ्यांना कामाला लावले. कोणी म्हटलं महादेव मंदिरात असतील, नाही कदम अण्णाच्याकडे असतील.....!
"अरे या वेळी कसे जातील तिथे , आज त्यांचा बसायचा वार!! आज नाही जाणार नाना तिथं"
" रघु सायकल घे आणि खाली गावात पाहून ये बरं."
"हो , लागलीच जातो जी."
रघु सायकलवर जाऊन पूर्ण गाव हिंडून आला, पण मालकांचा काही पत्ता नाही. गावात आता बऱ्यापैकी निजानीज झाली होती, त्यामुळे कोणाला विचारावे असा प्रश्न रघुला पडला? का कोणास ठाऊक पण एकदा मळ्याच्याकडं जाऊन पाहू म्हणून त्याने जोरात सायकल मळ्याच्या दिशेने हाणायला सुरुवात केली.
"मालक? आणि इथं झोपलेत? अन् आपुन सगळे बेजार..... झोपल्यात शांत जणू, उठवलं तर बडवत्याल मला, जाऊ आपून परत वाड्यावर अन् बाईसाहेबांना वर्दी देऊ." रघु स्वतःशी पुटपुटत परत निघाला.
इकडं वाड्यात सगळे काळजीत होते, तितक्यात रघु ज्या वेगाने मळ्यात गेला होता त्याच वेगाने घरी परत आलां आणि मालक मळ्यात आहेत आणि त्यांना तिथेच झोप लागली हे सांगितले.
" मालक शांत झोपल्यात, दोन दिस झाले त्यांना काय तर झालं आहे, म्हणून मी बी त्यांना उठवलं नाही, जातो सकाळी लवकर परत "
खरं तर रघु नानांचा नोकर, घरगडी, हरकाम्या होता .....पण त्याचा नानांवर आणि नानांचा पण त्याच्यावर खूप जीव होता. कधी कधी ते त्याला रागवत, त्याच्यावर ओरडतं ,.....कधी कधी तर हात उगारत, पण तोच हात कधी कधी मायेने त्याच्या पाठीवरून पण फिरवत. रघु लहान असल्यापासून वाड्यातच राहत आला, त्याचे लग्न पण नानांनी लावून दिले. आई बाप नसलेल्या या पोराला नानांनी सांभाळून मोठे केले...म्हणून त्याची रघु ला कायम जाणं होती.
वाड्यात अजून सगळे झोपलेले होते.
"शांता दरवाजा लावून घे. मी जातो मळ्यात" तांबडं फुटायच्या आत रघु मळ्याकडे निघाला.
मळ्यात नाना अजून झोपलेले होते. पांडू, किसन मात्र उठून खोली बाहेर आले, रात्रीच्या झोपेतून जनावरं पण एकदम ताजेतवाने होऊन रात्रीचा राहिलेला चारा खात उभे होते, त्यांच्या गळ्यातील घुंगर माळा आवाज करत होत्या. पाखरांचामुक्त विहार नुकताच सुरु झाला होता, कुठं कोंबडा दिस उगवला हे सगळ्यांना कळवत होता, हवेत सकाळचा गारवा होता आणि आता जरा जरा तांबडं फुटू लागल होतं. नाना शांतपणे डोळे उघडून खाटेवर बसले होते...... तितक्यात रघु पोहचलाच!
"रघुss ए रघु" नेहमीच्या सवयीनुसार नानांनी आवाज दिला,
लगेच रघु समोर हजर झाला,
"मला माहित आहे मालक उठले की मलाच बोलवत्यात, म्हणून सकाळीच आलो मळ्यात. तसा काल रात्री आल्तो मी .....पण तुम्हाला लय शांत झोप लागली व्हती..... म्हणून माघारी गेलो."
धारोष्ण दूध पीत नाना भरलेल्या मळ्याकडे पाहत होते...... ज्वारी, मका, कपाशीच्या पिकामुळे शेतामध्ये काळा, हिरवा, पांढरा रंग सगळीकडे पसरला होता. हे सगळे पाहून त्यांना आता खूप प्रसन्न वाटत होते. मनात एक उत्साह भरला होता, त्या सकाळच्या शुद्ध, प्रसन्न वातावरणामुळे ताजेपणा वाटत होता. दोन दिवसापासून पडलेली काळजी मिटल्या सारखे वाटत होते.
गाडीतून नाना आणि रघु प्रसन्न मनाने वाड्यात आले.
" मी गेली कित्येक दिवस वाड्यात आजारपणामुळे अडकून पडलो, घरातील माणसं मला काळजीने बाहेर जाऊ देत नव्हते. त्यामुळे मन बैचेन होत होते, जंगलातील वाघ पिंजऱ्यात कसा राहील, कायम समाजात वावणारा, आपल्या घामाने, मायेनं सांभाळ केलेला मळा कित्येत दिवस पाहता येत नव्हता. दोन दिवस कशातच मन रमेना, विचार करून दमलो आणि सरळ रात्रभर निसर्गाच्या सान्निध्यात शांत झोपलो, मन शांत झाले, मुक्त विहार, मुक्त आकाश आणि मी पण मुक्त, घराच्या चौकटीतून बाहेर पडून आलो. आता मन शांत झाले." नाना मनमोकळे पणे वकील साहेबांना बोलत होते.
"का हो नाना साहेब?"
"माहीत नाही पुढे काय होईल ते?"
"बरं.....तुम्ही म्हणाल तसं", पेन घेऊन वकीलसाहेब नाना सांगतील ते लिहत होते. नाना कोणाकोणाला काय द्यायचे ते सांगत होते.
"आमच्या रघुला मोठ्या विहरी कडच्या डाव्याबाजूला असलेले पाच एकर जमीन लिहून ठेवा."
"नाना........? रघु.........?"
"हो, त्याला पण द्यायचं आहे!!!"
"का? तो काही तुमचा खरा वारस नाही?"
"हो, पण काल परिक्षेत ते पोरं पास झालं."
"कोणती परीक्षा?"
"आपला बाप रात्री गायब झाला हे कळताच........ मुलगा नाही तर रघु मला शोधत आला आणि सकाळी सकाळी उठल्याबरोबर तुम्ही मला आवाज द्याल म्हणून हजर झालो म्हणणाराही रघूच होता. आपल्या बापाची इतकी काळजी घेणारा हा माझा मुलगाच की......!!!"
९०११०९६२५०








बढिया !!!!
ReplyDeleteApratim..👌
ReplyDeleteसुंदर! 👌
ReplyDeleteगावाचे वर्णन वाड्याचे वर्णन खूप छान केले आहे अगदी डोळ्यासमोर उभे राहिले सगळे चित्र, खुप छान.
ReplyDelete