"तुम्ही या वर्षी गिरनार ला जाणार आहात का?" दर वर्षी प्रमाणे अनेकांनी हा प्रश्न विचारला. असे प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येक दत्त भक्तांना घेऊन जायचे ठरवलेले असते. पण ते शक्य होत नाही. का कोणास ठाऊक वेळ जुळत नाही, रेल्वेचे तिकीट मिळत नाहीत,माहीत नाही. पण अशा सर्वांना पुढील वर्षी तरी नक्की घेऊन जावे असे मनात दत्त महाराज सुचवतात हे नक्की. त्याच मुळे दर वर्षी किमान एक नवीन दत्त सेवक घेऊन जात येत आहे. कदाचित महाराजांची तशी इच्छा असेल.
गिरनार पर्वत हा असा पर्वत आहे जिथे प्रत्यक्ष श्री गुरुदेव दत्त महाराज यांच्या संजीवन पादुका आहेत. जिथे त्यांचा अखंड वास आहे. ते क्षेत्र केवळ अनुभूती घेऊनच लक्षात येते. पहिल्यांदा जेव्हा सेवा घडली तेव्हाच त्या सगळ्या गोष्टी पाहून हे नक्की समजायला लागले की आपण जो काही विचार करतो, जे काही संकट,जी काही चांगली वाईट घटना अनुभवतो त्याचा पक्का अभ्यास आणि त्याला तोंड देण्याची खरी ऊर्जा या ठिकाणावरून मिळते.
आपले दर्शन घेऊन झाले तरी मनाला समाधान/तृप्ती मिळत नाही,परत लवकरात लवकर यावे असे दर्शन घेऊन जेमतेम १० पायऱ्या उतरल्या वरच वाटते हे असे का होते हे देखील एक मोठे कोडे आहे?
मागील काही वर्षात मंदिरातील सुवास(अत्तर, धूप) पादुका, मूर्ती पाहून नकळत डोळ्यात पटकन पाणी यायला लागले आहे. कदाचित आईची ओढ लागलेल्या बाळाला आई तिच्या घट्ट मिठीत घेते तेव्हा दोघांच्या डोळ्यात पाणी येते न अगदी तसेच काहीसे होत आहे. अशीच भावना आपल्याला देखील तिथे गेल्यावर अवश्य येईल. कदाचित आपण ज्या दर्शनासाठी इतके कष्ट घेऊ शकलो आणि त्यांच्या कृपेनेच दर्शन घेऊ शकलो आहोत, त्यांच्याच मुळे ही भावना जागी होत असेल. आपल्यातील अहंकार,(सोप्या भाषेतील सांगायचे तर माज) एका क्षणात उतरवला जातो अशी जिवंत जागा दुसरी नसेल असेच वाटते.
गिरनाराची पहिली पायरी ते गुरु शिखर येथील पादुका याचे अंतर किंवा दिशा पाहिल्या तर लक्षात येते की आपण सुरुवात अशा ठिकाणावरून करतो जिथून जायचे कोठे आहे हे दिसत नाही किंवा गुरू शिखर दिसत नाही. फक्त मधले टप्पे दिसतात ( नेमिनाथ,गोमुख तीर्थ, अनेक लहान लहान मंदिरे) ते टप्पे पार करून चढून आल्यावर जेव्हा मध्यापेक्षा जास्त अंतर संपते (७,००० पायऱ्या) तेव्हा कुठे गुरूशिखर दिसते. हे सगळे आपल्या आयुष्यातील घटनांना समोर ठेवून केलेली योजना आहे असे वाटत नाही का? जन्माला आल्यावर शेवट हा निश्चित आहे. आयुष्याच्या मध्यावर आल्यावर मागील केलेल्या चांगल्या वाईट गोष्टी आठवतात जसे पायऱ्या चढून वर आले की रात्रीच्या अंधारात गिरनार पायथ्या कडील फक्त light दिसत राहतात आणि पुढे पाहिले तर अजून बराच प्रवास करायचा बाकी आहे. हे लक्षात येते. गिरनार पर्वतावरील चढण, उतार हे सगळे आपल्या आयुष्याची वाटचाल दाखवणारे क्षेत्र आहे. आपल्या बुद्धीला याची सांगड घालता आली तर पटकन अनेक विषय लक्षात येतील...
आपल्याला गुरूंकडून हिच शिकवण मिळते. आंतरिक ओढ जितकी जास्त तितके दर्शनाचा अनुभव जास्त हे देखील लक्षात यायला लागले.
खूप काही लिहिता येईल,खूप काही सांगता येईल पण याचा उद्देश एकच आहे. जास्तीत जास्त गुरुसेवा अखंड घडत राहावी. दर वर्षी किमान एकदा तरी त्या संजीवन पादुकांचे दर्शन घडत राहो.
जय गिरनारी



जय गिरनारी
ReplyDeleteGurudev Datt... Jai Girnari
ReplyDelete