" निरोप "
"शाहिस्तेखानाचा मुक्काम पुण्यातील लाल महालात पडला होता, लहानशा पुण्यात जवळ जवळ १.२५ लाख सैन्य वस्तीला आणि शाहिस्तेखानाच्या सोबतीला होते. अजस्त्र अजगर पडावा तसेच हे सैन्य पुण्यात पडलेले होते. त्यांनी जागोजागी मोर्चे बांधले होते, राहुट्या, तंबू, घोडे, हत्ती, तोफा असेल सगळे पुण्याच्या परिसरात होते. लाल महालात बसून शाहिस्तेखान राजकारण आणि मौजमजा करत होता. त्याने आता आपल्या एका विश्वासू सरदारदाराला कामगिरीवर पाठवले. त्याचे नाव कारतलबखान (खान). हा मोठा शुर पण तितकाच घमेंडी असा मोघल सरदार होता. तो आपल्या सैन्याला घेऊन कोकण प्रांत कब्जा करायला निघाला होता."
मी सगळ्या सोबतीच्या सवंगड्यांना स्वारगेटच्या बस स्थानकात ही गोष्ट सांगत होतो. एका उंबराच्या झाडाच्या सावलीत आम्ही सगळे मंडलात बसलो होतो. पिकलेले एखादे उंबराचे फळ अधून मधून खाली पडत होते. आमच्यात कोणी १२ वर्ष ते अगदी २९ पर्यंत असे आम्ही १५ मुलं आज राजगडला निघालो होतो आणि तेही मुक्कामी.
आमच्या बसला अजून काही वेळ होता. आमची ही बस संध्याकाळी ५.३० ला होती. तसा खूप अजून वेळ होता. पण आता कोणालाच धीर धरवत नव्हता. तसे आम्ही सगळे एकत्र जमण्याची वेळ दुपारचे ४.०० हीच दिली होती. सगळे संघ स्वयंसेवक असल्याने बरोबर वेळेच्या पाच मिनिट आधीच स्टँडवर आले. मग आता त्यांनी ईकडे तिकडे फिरून चुकणे आणि स्वतःला न दमवून घेणे.या साठी गोष्टीचा पर्याय शोधला होता." शाहिस्तेखानाने चाकणचा किल्ला घेतला ( जिंकला ). त्याला हा छोटा भुईकोट किल्ला घेण्यासाठी पण खूप कष्ट करावे लागले होते. हा चाकणचा संग्रामदुर्ग घेतल्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला आणि म्हणून त्याने कारतलबखान ( खान ) याला सह्याद्री उतरून चौल, कल्याण, भिवंडी, पनवेल व नागोठणे हा भाग काबीज करण्यासाठी या कामगिरीवर पाठवले होते. या कामगिरीच्या आधी कारतलबखान याने परिंडाचा किल्ला जिंकून घेतला होता आणि तो परत पुण्यात दाखल झाला होता. कारतलबखान सोबत अनेक मात्तबर सरदार या कामगिरीवर त्याच्या सोबत दिलेले होते. त्यात एक माहूरची स्त्री ' रायबाघन' म्हणजे वाघीण हि देखील या मोहिमेत सोबत करत होती.
झाडाखाली बसून सगळे मुलं इतिहास ऐकण्यात मग्न होते. मध्येच कोणी तरी म्हणाले "आपली एसटी आली!!!", "कोणी म्हणाले नाही,नाही!!! आपली नाही."
" कारतलबखान एका अरुंद वाटेने तळ कोकणात उतरायला निघाला होता. या मार्गात प्रचंड डोंगर आणि विलक्षण अरुंद वाटेत सैन्याच्या लव्याजम्या सहित यात अगदी हत्ती,मोठ्या तोफा, घोडे असे सगळे होते. तो घाट उतरून आता उंबरखिंडीतून खाली कोकणात उतरणार होता. खरंतर आपल्या या मोहिमेची गुप्तता पाळली जावी हा त्याचा मुख्य हेतू होता. पण महाराजांच्या हेरांनी कारतलबखानची सर्व बातमी महाराजांकडे पोंचती केली होतीच."
अशी गोष्ट रंगात आणि विस्तृत गोष्ट सांगणे सुरू होती, मी सांगता सांगता उभा राहून सगळ्यांना गोष्ट सांगत होतो. आता त्या झाडाखाली उभा मी, मंडलात बसलेले सर्व स्वयंसेवक आणि माझा बोलण्याचा आवेश, हातवारे करत सांगण्याची पद्धत बहुदा इतर लोकांना पण आवडली आणि स्टँड मधील काही इतर प्रवासी आमच्या जवळ येऊन उभे राहिले. आता आमच्या मंडलाच्या बाहेर अजून एक वर्तुळ तयार झाले.
"काका, गुंजवणे गाडी?" चौकशी खिडकीपाशी जाऊन एकाने विचारेल.
" लागलं आता...झाला टाईम"
" अरेsss, बस येती आहे रे... असे ते कंट्रोलर म्हणाले, चला वावरा आपले आपले सामान, उर्वरित गोष्ट बसमध्ये ऐकू आता." तो मित्र दुरूनच ओरडत आमच्या जवळ आला.
सगळ्यांनी आपआपले सामान घेतले. मोठ्या सॅक, झोपायच्या मॅट, पाण्याच्या बाटल्या, दंड, स्वयंपाक करायला मोठे जर्मंनचे पातले ( खिचडी स्पेशल), मोठे उलथणे, पातेल्यावर झाकणी आणि इतर शिधा यांचा एक स्वतंत्र डाग झाला. असे सगळे सामान घेऊन बस जेथे येणार होती त्या जागेवर जाऊन उभे राहिलो. बरेचदा स्थानिक जिल्ह्यात जाणाऱ्या गाड्या या कोणत्याच प्लॅटफॉर्मवर लागत नाहीत. बसवर गावाची नावं काळ्या पाट्यांवर लिहलेले असतील की समजावे ही बस जिल्ह्यात प्रवास करणार आहे.
आम्ही सगळे घोळका करून बसची वाट पाहत उभे होतो. तितक्यात एक साधारण वय असेल ४५-५० वर्षे. अंगात पांढरा ढगळ लेंगा, पांढरा सदरा, डोक्यावर पांढरी टोपी, पायात एकदम जाडजूड चामंडी पायताण घातलेला माणूस माझ्या जवळ आला.
"धन्यवाद काका"
" तुम्ही गुंजवणेला जाणार का?" काकांनी विचारले.
"हो"
" मंग एक काम करता का ?"
"हो,बोला की"
" हे जरा सामान आमच्या लेकीच्या घराकडं पोंचवता का? नाही म्हणजी औषध हायती आणि आमच्या बारकी साठी खाऊ आहे. नातं माझी, म्हनंजी तुम्हाला तरास नसलं तर , न्या बरं का!!!"
संघाच्या शिकवणीत सेवाभाव आहेच आणि सुदैवाने माझ्यात पण तो घडला आहे.
" काका, पण ते मला कसे ओळखतील?" त्यावेळी काही मोबाईल आले नव्हते. जरी असतील तरी फक्त काहीच लोकांकडे ते होते आणि खेड्यात तर शक्यच नव्हते. माझी शंका रास्त होती.
" दयाss तुम्ही, घेत्याल ते"
त्यांनी जरी आग्रहाने सांगितले तरी मला काही त्यांचा विचार पटला नाही.
" काका तुमचे म्हणणे ठीक आहे. तरी एक काम करा, या वहीत तुम्ही लिहा, म्हणजे घरी त्यांना माझा पण विश्वास बसेल" मी माझ्या सॅकमधून डायरी पेन काढून त्यांच्या समोर धरली.
त्यांनी आपल्या नावासहित वरील फोटोतील ' निरोप ' वहीत लिहला. प्रेमाने आदरातिथ्य करावे यासाठी 'चहा पाजावा' असे पण लिहिले. मग माझे आभार मानून ते निघून गेले.
आमची बस आली, आम्ही सगळ्या सामना सकट बसमधे चढलो. मुक्कामी जाणाऱ्या गाडीत आम्ही १५ आणि काही स्थानिक गावकरी आणि सगळ्यांचे सामान. असे पोटात घेऊन ती बस स्वारगेट बसस्थानकावरून निघाली.
आता प्रवास सुरू झाला. बाहेर हळू हळू अंधार पडायला लागला, बसने कात्रजचा जुना बोगदा ओलांडला तेव्हा बाहेर पूर्ण अंधार पडला होता.
" हो , आपण कुठं पर्यंत आलो होतो मगाशी?"
" हेरांनी माहिती दिली होती" एक लहान वयाचा स्वयंसेवक पटकन म्हणाला. त्याच्या नेमके हे लक्षात होते.
" डोंगरी मुलखाची नीट ओळख नसलेले कारतलबखानाचे सैन्य कसेबसे घाट ओलांडून खाली उतरले, आता ते घनदाट जंगलात, अरुंद वाटा, सूर्याचा प्रकाश देखील नीट जमिनीवर पडू न शकणाऱ्या अशा अरण्यात प्रवेश करत होते. ते सगळे सैन्य पुढे चालत होतो. आपण कुठे जातोय? कुठे जायचे आहे ? याचा काहीच थांगपत्ता त्यांना लागत नव्हता. तरी ते सैन्य त्यातील बाकी सरदार यांना कारतलबखान पुढे चला पुढे चला म्हणून प्रोत्साहन देत होता.
"कारतलबखान उंबरखिंडीच्या भयाण जंगलात आला, तिथे प्रंचड मोठे मोठे उंचच उंच वृक्ष, किर्रर्र झाडी, ना वारा, ना पाणी अश्या बिकट जागी पोंचला. तितक्यात त्या जंगलात रणभेदी तुतारी वाजू लागल्या, पण हे आवाज कुठून येतायत हे कोणालाच दिसत नव्हतं, समजतं नव्हतं, अशातच झाडावरून, झाडांच्या बुंध्या मागून सर्रssसर्रss आवाज करत धनुष्यबाणाचा वर्षाव सुरू झाला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे खानाचे सैन्य अगतिक झाले."
मध्येच मी जरा पाणी घेतले, बसमधील सगळ्यांंचे तोंड पाहिले. तर सगळे आतुरतेने पुढील कथेची वाट पाहत बसलेले मला दिसले.
"शिक्षक पुढे काय ? सांगा न पटकन!!!" तो मागचा छोटा स्वयंसेवक म्हणाला, त्याला आता धीर धरवत नव्हता. पाणी पिवून मी पुढे सांगू लागलो.
" महाराजांनी बरोबर खानाला असा अडकवला की, त्याला आता पुढे जाता येईना आणि आपण मागून कोणत्या रस्त्यावरून आलो तो रस्ता पण दिसेना. मागे कसे जायचे हे पण समजेना. त्याला दोन्ही कडून आपल्या मावळ्यांनी अडकवला होता. नेताजी पालकर हे त्याच्या मागल्या बाजूस होते, तर स्वतः महाराज समोरच्या बाजूस. मार खाणारे मोघल सैन्य आणि बिकट जागी अडकलेला खान यामुळे त्याचा आता पूर्ण धीर घचला. तरी तो आपल्या सगळ्या सैन्याला सोबतच्या सरदारांना धीर एकवटून पुढे चला पुढे चला असे ओरडून म्हणतं होता. पण नेमके आपण यातून आता कसे सुटायचे हे काही त्याला लक्षात येईना. शेवटी रायबाघन हिनेच त्याला समजावले. आपली झाली तितकी दैना पुरे झाली, आता एक दूत शिवाजी महाराजांच्याकडे पाठवा असा सल्ला तिने दिला.
" खानाच्या दुताने महाराजांकडे निरोप पाठवला आणि भेटायची वेळ मागितली. आपले खानसाहेब बीनशर्त शरणागती पत्करायला तयार आहेत हा निरोप त्याने खाना तर्फे महाराजांकडे सादर केला. या सगळ्यातून अंगावरच्या कपड्या निशी खान आणि वाचलेल्या सैन्याला परत जाण्याची महाराजांकडून अनुमती मिळाली,त्यांचे सर्व सामना,हत्ती,तोफा,घोडे जप्त झाले. आपला जीव वाचला बसंss म्हणतं खान माघारी फिरला".
असे हे निरोपाचे महत्व आहे.हा याच निरोपामुळे खान वाचला आणि महाराजांना पण खाना कडून ही सगळी खंडणी मिळाली. आपल्या रोजच्या जीवनात आपण कधी असे बरे, वाईट, दुःखी, रागाचे निरोप एकमेकांना देत घेत असतो. कधी आपला निरोप समारंभ कधी दुसऱ्याचा निरोप समारंभ, कधी कोणाला कायमचा निरोप देण्यासाठी जावे लागते. आपल्याला हे निरोप पहायला मिळाले असतीलच. 'आज पेपर नको', 'मी येऊन गेलो', 'आज संध्याकाळी नेहमीच्याजागी भेटू','माझ्याआवडीचा टीशर्ट घाल', 'अर्धा लिटर ' आठवला...नं!!! असे अनेकांसाठी निरोप लिहलेले असतील किंवा सांगितले असतील.
मी बस मधील कथेचा शेवट केला.आम्ही उरलेला प्रवास पूर्ण केला आता राजगडाच्या पायथ्याला आलों. तेव्हा रात्रीचे १० वाजत आले होते.बस झाडा खाली थांबली. माझ्या सोबतचे त्या काकांचे सामान आणि डायरी मधील निरोप मी त्यांचे घर विचारून, घरात पोंचता केला.
९०११०९६२५०




*निरोप* उत्तम अतिशय प्रेरणा देणारी आणि जबाबदारी ची कथा आहे, खुप छान.... शिक्षक
ReplyDeleteनेहमी प्रमाणे सुरेख वर्णन. पूर्वी श्रद्धा आणि विश्वास ह्यावरच सर्व कामे चालत जसे निरोप देणे किंवा एखादी वस्तू पोहचवणे एखाद्याशी ओळख नसली तरी काम व्हायचे. अजूनही काही खेडे गावात ही परंपरा पाळतात.
ReplyDeleteखूप छान लेख आहे मी पण गोष्ट ऐकण्यास आतुर होते,पुढे काय होणार
ReplyDeleteमस्त
Deleteखूप छान आतुरता वाढवणारी
Deleteराजश्री पाटणकर.
Delete